फूट टाळण्यासाठी मुख्यमंत्रीपद नाकारले:पवार
राष्ट्रवादीकडे तेव्हा मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता
मुंबई
२००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता, त्यावेळी छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्षात फूट पडली असती, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केला.
गेल्या काही दिवसापासून खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ‘२००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभेत सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री करता आला असता पण पक्ष नेतृत्वाने मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिले’, असा आरोप अजित पवार यांनी खासदार शरद पवार यांच्यावर केला होता. या आरोपावर आता पवार यांनी मोठा खुलासा केली आहे.
२००४ मध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय फार विचारपूर्वक घेण्यात आला होता. तेव्हा अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपविण्याचा प्रश्न नव्हता. कारण ते फारच नवखे होते. मुख्यमंत्रिपदासाठी कोणी योग्य नेता आमच्याकडे नव्हता. तेव्हा छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रिपद दिले असते तर भविष्यात पक्षात फूट पडली असती.त्यामुळे अधिकची मंत्रिपदे आणि खाती मिळवून मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे कायम ठेवण्याचा निर्णयावरआम्ही आलो, असंही खासदार शरद पवार म्हणाले.
