भारताचे चीनला सडेतोड उत्तर


प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर उभारली वाहने दुरुस्ती केंद्र

Advertisement

नवी दिल्ली
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर नजर रोखलेल्या चीनच्या महत्त्वाकांक्षेला नेस्तनाबूत करण्यासाठी भारताने महत्त्वाचे पाऊल उचलले असून पूर्व लडाखमध्ये ५००हून अधिक रणगाडे आणि लष्कराच्या लढाऊ वाहनांना तैनात केले आहे. भारतीय लष्कराने चीनच्या सीमेजवळ न्योमा आणि डीबीओ सेक्टरमध्ये १४ हजार ५०० फुटांहून अधिक उंचीवर दोन लढाऊ वाहने (आर्मर्ड) दुरुस्ती केंद्र उभारले आहेत.
एप्रिल-मे महिन्यांत भारत आणि चीनदरम्यान संघर्ष सुरू झाल्यानंतर पूर्व लडाखमध्ये मोठ्या संख्येने रणगाडे आणि बीएमपी लढाऊ वाहनांसह शीघ्र कृती लढाऊ वाहनांनाही येथे तैनात करण्यात आले आहे. रणगाडे आणि लष्कराच्या गाड्यांना या उंच ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे येथे लढाऊ वाहनांच्या हालचालींसाठी मदत मिळणार आहे. आम्ही न्योमा आणि डीबीओ सेक्टरमध्ये केएम- १४८ जवळ मध्यम लढाऊ वाहनसुविधांची स्थापना केली आहे, अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.
भारतीय लष्कराकडून सर्वोच्च उंचीवरील भागात टी-९० आणि टी-७२, बीएमपी आणि वज्र ९ ऑटोमेटिक हॉवेत्जरसहित स्वतःच्या रणगाड्यांना ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. येथे हिवाळ्यात तापमानात खूप घसरण होते. शून्य ते ४० अंशाच्या तापमानाच्या आव्हानात्मक हवामानातही लढाऊ वाहने सक्षमपणे कार्यरत राहतील, अशा सुविधा येथे निर्माण करण्यात आल्या आहेत. लष्करप्रमुख मनोज पांडे यांनीही नुकताच येथे पाहणीदौरा करून या सुविधांचा आढावा घेतला. या नव्या प्रकल्पांमुळे रणगाडे आणि लष्करी जवानांना अत्याधुनिक सुविधा मिळत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!