सावधान, उष्णता वाढणार
पुढचे ५ दिवस पारा २ ते ४ अंशाने वाढणार
मुंबई
राज्याच्या काही भागावर असलेले अवकाळी पावसाचे सावट आता संपले आहे. यापुढे पारा हळूहळू वर चढणार असून नागरिकांना दिवसा उन्हाचे चटके, उष्णता व रात्री उकाड्याचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे लागेल.यापुढे मध्य भारत, विदर्भ, मराठवाडा, खांदेश व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात दिवसाचे कमाल तापमान २ ते ४ अंशाने वाढण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात हा ताप तीव्र हाेणार आहे. दिवस व रात्रीच्या दोन्हीही तापमानात मात्र हळूहळू वाढीची शक्यता असून जन-जीवनाला असह्य उष्णता व उकाड्याशी सामना करावा लागेल. दक्षिण मध्य महाराष्ट्रात उष्णतेचा परिणाम अधिक जाणवेल. काेकणात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
नागपूरसह विदर्भाचा पारा वर उसळला. गाेंदिया वगळता सर्व १० जिल्ह्यात कमाल तापमान ४० अंशाच्या वर पाेहचले. नागपूर २४ तासात २.७ अंशाने वाढून ४०.१ अंशावर गेले आहे. सर्वाधिक ४२.३ अंश तापमान अकाेला येथे नाेंदविण्यात आले.गाेंदियाचा पारा ४.४ अंशाने उसळला. चंद्रपूर, वर्धा, यवतमाळात तापमान ४१ अंशावर आहे. रात्रीच्या तापमानात अंशत: घट नाेंदविण्यात आली असली तरी ३० एप्रिलपासून पुढे त्यात वाढ हाेण्याचा अंदाज आहे.
