हिशेब चुकता केल्याशिवाय राहणार नाही


शिवसेना पळवल्याचा आरोप करत उद्धव ठाकरेंचं भाजपला आव्हान
हिंगोली
शिवसेना पळवल्याचा हिशेब चुकता केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.उद्धव ठाकरे यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश आष्टीकर यांच्या प्रचारार्थ हादगाव येथे जाहीर सभा घेतली. या सभेतून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला.
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना आम्ही पहिल्याच अधिवेशनात कर्जमुक्ती केली होती. कापूस आणि सोयाबीन पिकांना चांगला भाव दिला होता. पण गद्दारी करुन आमचं सरकार पाडलं. नाहीतर, मी पुन्हा एकदा कर्जमाफी केली असती, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
आपण जनतेच्या न्यायालयात शिवसेना कुणाची याबाबत प्रश्न मांडले होते. आता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की, विधिमंडळाच्या बहुतमताच्या आधारावर पक्ष कुणाचा आहे हे ठरवू शकत नाहीत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
“तुम्ही जगा किंवा मरा, पण मला पंतप्रधान करा अशी यांची वृत्ती आहे. जे शेतकरी उत्तरेमध्ये रस्त्यावर उतरले होते. त्या शेतकऱ्यांच्या वाटेवर यांनी खिळे टाकले. त्यांच्यावरती बंदुका घेऊन पोलीस उभे केले. ड्रोनमधून अश्रूधुरांचे गोळे सोडले, त्यांना दिल्लीत येऊ दिले नाही, तुम्ही कुणाकडे दाद मागणार”, असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला.
हेमंत पाटील यांना उमेदवारी देऊन चूक केली होती. त्याबद्दल आपली माफी मागतो, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी हिंगोलीकरांची माफी देखील मागितली. २०१९ साली झालेल्या निवडणुकीत मोदींचा फोटो लावला म्हणून आम्ही निवडून आलो, असं हेमंत पाटील म्हणत होते. मग आता बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावून प्रचार का करीत आहे? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!