मर्यादा पाळा अन्यथा सर्व बाहेर काढेन
ठाकरेंची सर्व कागदपत्रे माझ्याकडे: एकनाथ शिंदे
मुंबई : लंडन ते लखनऊ, खोके ते कंटेनर उद्धव ठाकरेंच्या सर्व प्रकरणाची सर्व कागदपत्र माझ्याकडे आहेत. मर्यादा पाळा नाहीतर सर्व समोर आणेन, मग तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. तर पोराटोरांवर मी बोलत नाही, असे म्हणत नाव न घेता आदित्य ठाकरेंवरही शिंदेनी निशाणा साधला.
आदित्य ठाकरेंच्या आरोपावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, पुरोगामी महाराष्ट्र सगळ्यांनी पाहिलाय पण आजकाल खाल्यचा शब्दातले आरोप प्रत्यारोप होत आहे. कमरेखालचे वार या सगळया गोष्टी लोकांना नाही आवडत. लोकांना विकास हवा. आज जे काही आरोप होतात, खरं तरं सत्ता गेल्यानंतर काही लोकं सैरभैर झालेत. त्यामुळे त्यांचं संतुलन बिघडलंय. पोरटोरांच्यावर मी बोलतं नाही. त्यांचं वय किती, त्याच्या कामाचा अनुभव, पक्षासाठी किती योगदान आहे, आज त्यांच्या वयापेक्षा जास्त पक्षाचं काम केलेले रक्ताच पाणी केलेले लोक आहेत. लोकांकडून पाया पडून घेणं, लोकांना आवडतं नाही. बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे. परंतु हे सरंजामदारपणे वागणारे लोक आपल्या सहकाऱ्यांना घरगडी समजतात.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कॅशचं गोडाऊन सापडलं होतं या आदित्य ठाकरेंच्या या दाव्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, जनतेला माहीत आहे एकनाथ शिंदे कोण आणि माझी काय कमाई आहे. कोणी तरी म्हटले खोके नाही कंटेनर लागतात, कंटेनर कुठे गेले तेही माहीत आहे. दोन वर्षानंतर हा शोध लावला. खोके मोजल्याशिवाय झोप येत नाही ते आमच्यावर आरोप करत आहेत. आमच्याकडे कोणती प्रॉपर्टी नाही काही नाही आम्हाला लोकांची सेवा करायची. मला जास्त बोलायला भाग पाडू नये.
आदित्य ठाकरेंच्या वैयक्तिक टीकेवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. मर्यादेबाहेर गेल्यानंतर आमच्याकडे खुप काही आहे. लंडनच्या विश्रांतीचा उच्चार केल्यावर एवढं अस्वस्थ होण्याचं कारण काय? आमच्याकडे सगळं आहे. लखनौमध्ये 200 एकर जमीन चतुर्वेदींची पकडली त्याबरोबर कोण आहे सगळं माहीत आहे. लंडनमधल्या प्रॉपर्टी कोणाच्या आहेत सगळं माहिती आहे सगळे कागदपत्र आहे. पण आम्ही मर्यादा पाळतो. वैयक्तिक आरोप करणं बाळासाहेबांनी आणि आनंद दिघेनी नाही शिकवलं. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले पण बाळासाहेबांची संस्कृती विसरले आहेत.
राज ठाकरे मोठ्या मनाचे, उद्धव ठाकरेंसारखे कद्रू मनाचे नाहीत, ते आल्यानं ताकद वाढली. ज्या काही तडजोडी होतील त्याला वेळ आहे. त्याचा महायुतीवर काहीही परिणाम होणार नाही. राज ठाकरेंचा महायुतीला पाठिंबा देण्यावर एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
