इमानदार व्यक्तीला घाबरण्याची गरज नाही:मोदी
भ्रष्टाचारामध्ये अडकलेल्या लोकांना पापाची भीती
नवी दिल्ली :
‘ईडीने दाखल केलेल्या बहुतेक केस अशा व्यक्ती आणि संस्थांविरोधात आहेत, ज्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. इमानदार व्यक्तीला घाबरण्याची गरज नाही. भ्रष्टाचारामध्ये अडकलेल्या लोकांना पापाची भीती असते’, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाआधी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ईडीच्या कारवायांवरून सरकारवर होत असलेल्या आरोपांवर भाष्य केलं आहे.
मागच्या 10 वर्षांमध्ये आम्ही 2200 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. 2014 आधी ईडीने फक्त 34 लाख रुपये जप्त केले होते. हे पैसे स्कूल बॅगमधून नेले जायचे. आमच्या कार्यकाळात जे पैसे जप्त झाले ते घेऊन जायला 70 छोट्या ट्रकची गरज भासली. 2200 कोटी रुपये म्हणजे ईडी चांगलं काम करत आहे. भ्रष्टाचाराने देश उद्ध्वस्त केला आहे, याला पूर्ण ताकदीने संपवावं लागेल’, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले
‘विरोधी पक्षातले किती नेते जेलमध्ये आहेत, मला कुणीही सांगत नाही. मी जेव्हा गृहमंत्री होतो तेव्हा माझ्या गृहमंत्र्याला यांनी जेलमध्ये टाकलं होतं. ईडीच्या फक्त 3 टक्के प्रकरणांमध्ये राजकीय नेत्यांचा समावेश आहे. 97 टक्के लोक अशी आहेत, ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही’, असं पंतप्रधानांनी सांगितलं.
‘ड्रग माफिया, अधिकारी भ्रष्टाचारामध्ये सामील आहेत. ज्या अधिकाऱ्यांनी बेनामी संपत्ती बनवली, त्यांना जेलमध्ये पाठवलं गेलं आहे. 2014 पासून केंद्रातला कार्यभार सांभाळल्यानंतर केंद्रीय यंत्रणांनी भ्रष्टाचार संपवण्यासाठी महत्त्वाचं योगदान दिलं आहे. 2014 आधी ईडीने फक्त 5 हजार कोटींची संपत्ती जप्त केली होती, ईडीला कारवाई करण्यापासून कुणी रोखलं होतं का? यात कुणाचा फायदा होत होता? माझ्या कार्यकाळात देशात 1 लाख कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली गेली, हा लोकांचा पैसा नाही का?’ असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ईडीच्या कारवायांचं कौतुक केलं आहे.
