2047 पर्यंत विकसित अर्थव्यवस्थेचे ध्येय मूर्खपणाचे
रघुराम राजन यांची स्पष्टोक्ती
नवी दिल्ली :
पुढील 25 वर्षात देशाला विकसित देश बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष्य आहे. मात्र मोदींचे 2047 च्या विकसित भारताचे ध्येय मूर्खपणाचे आहे, असे वक्तव्य भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केले आहे.
रघुराम राजन म्हणाले की, भारत आपल्या मजबूत आर्थिक वाढीबाबतच्या अवाजवी प्रसिद्धीवर विश्वास ठेवून मोठी चूक करत आहे. कारण देशाला अजूनही आपली क्षमता पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण पायाभूत समस्या सोडवणे आवश्यक आहे. कारण निवडणुकीनंतर नव्या सरकारसमोरील सर्वात मोठे आव्हान हे कर्मचाऱ्यांचे शिक्षण आणि कौशल्ये सुधारण्याचे असेल आणि हे निश्चित केल्याशिवाय भारत आपल्या तरुण लोकसंख्येचा फायदा घेण्यासाठी संघर्ष करेल. तेही अशा देशात जिथे 1.4 अब्ज पेक्षा जास्त लोकसंख्येपैकी निम्म्याहून अधिक लोकसंख्या 30 वर्षांपेक्षा कमी आहे.
या उद्दिष्टाची चर्चा “मूर्खपणाची” आहे. जर तुमच्याकडे बरीच मुले हायस्कूलचे शिक्षण घेत नसतील आणि विद्यार्थ्यांचे भारताबाहेर पडण्याचे प्रमाण जास्त असेल तर भारताची विकसित अर्थव्यवस्था बनण्याचे ध्येय गाठता येणार नाही कारण आपल्याकडे कर्मचारी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हे लोक चांगल्या नोकऱ्यांवर कार्यरत असतील तरच आपल्याला फायदा होऊ शकतो. यासाठी भारताला सर्वातआधी आपल्या कर्मचाऱ्यांच्या हाताला काम द्यावे लागेल आणि त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती करावी लागेल.
