केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा
भाजपने अन्याय केल्याचा आरोप
नवी दिल्ली
भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी एकही जागा न दिल्याने नाराज असलेले आरएलजीपी प्रमुख पशुपती पारस यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.पत्रकार परिषदेत राजीनामा दिल्याची माहिती देताना त्यांनी माझ्यासोबत आणि माझ्या पक्षासोबत अन्याय झाला असल्याचा आरोप केला आमच्या पक्षाला एकही जागा देण्यात आलेली नाही.
पशुपती पारस हे राजीनामा देण्याआधी मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते. बिहारमधील जागवाटपामध्ये भाजपने चिराग पासवान यांच्या एलजेपी (रामविलास) पक्षाला महत्त्व दिलं आहे. एलजेपीला पाच जागा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नाराज असलेल्या पारस यांनी राजीनामा दिला आहे.बिहारमध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी एनडीएच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाला आहे.भाजप बिहारमध्ये १७ जागांवर लढणार आहे, तर नितीश कुमार यांची जेडीयू १६ जागांवर आपला उमेदवार देणार आहे. इतर घटक पक्ष जसे की दिवंगत रामविलास पासवान यांचे पुत्र आणि लोकजनशक्ती पार्टीचे (रामविलास) प्रमुख चिरास पासवान यांना पाच जागा देण्यात आल्या आहेत.जीतनराम मांझी यांच्या पक्षाला (HAM) एक जागा, तर उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक जनता दलाला एक जागा देण्यात आली आहे. याआधी पशुपती पारस यांचा आरएलजेपी यांचा पक्ष एनडीएचा घटक पक्ष होता, पण त्यांना यावेळी एकही जागा देण्यात आलेली नाही. भाजपने निवडणुकीचे धोरण आखताना चिराग पासवान यांच्यावर जास्त विश्वास दाखवला आहे.
पशुपती पारस यांचे भाचे असलेले चिराग पासवान यांना भाजपकडून प्रोत्साहन मिळत होते. त्यामुळे पारस यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. भाजपने पशुपती पारस यांना टाळणे सुरु केले होते. जागावाटपाआधी त्यांच्यासोबत चर्चा देखील करण्यात आली नव्हती असं सांगितलं जातं.
