ओ.पी नय्यर,मदन मोहन यांच्या गाण्यांचा कार्यक्रम
सातारा
मास्टर ऑफ ऱ्हिदम ओ.पी नय्यर आणि मेलडी किंग मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्याचा कार्यक्रम दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहमध्ये संपन्न झाला. हा कार्यक्रम दीपलक्ष्मी नागरी पतसंस्था आणि सुहाना सफर ग्रुप यांच्यामार्फत आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर कामिनी पाटील, उद्योजक श्री अरुण जाधव सौ नंदा जाधव, सौ सुनिता बोरुले, श्री शिरीष चिटणीस व विजय साबळे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शिरीष चिटणीस यांनी कार्यक्रमा मागील भूमिका स्पष्ट केली. गाणे सादर करणाऱ्या कलाकारांनी गाण्याची पार्श्वभूमी तसेच त्यामधील अर्थ उमजून घेऊन गाणे म्हंटल्यास त्या गाण्यातील भावना लोकांपर्यंत जास्त चांगल्या पद्धतीने पोहचतात असे प्रतिपादन केले. तसेच गाणे गाणाऱ्या कलाकारांनी वाचन संस्कृती जोपासावी असे आवाहन केले.

नंदा जाधव म्हणाल्या, गाण्याबरोबर त्याचा इतिहास माहित असेल तर ते गाणं म्हणताना अजून चांगल म्हणता येत.याच एक उदाहरण म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर. त्यांच्या मैत्र जीवांचे या कार्यक्रमात ते गाणं कोणी लिहिलं,का लिहीलं, कोणी गायलं याचबरोबर त्या गाण्याचा अर्थ स्पष्ट करून ते सांगायचे.
अरुण जाधव म्हणाले, आजचा गाण्यांचा कार्यक्रम खूप छान झाला. सगळ्यांची गाणी मला खूप आवडली. यातील जवळजवळ सर्व गाणी मला माहित होती. कारण १९७३ साली मी सातारा रोड येथे कूपर मध्ये नोकरी करीत होतो.सकाळी साडेसात वाजता जुनी गाणी रेडिओ वर लागायची.ती ऐकत तयार व्हायचे आणि शेवटी सैगल साहेबांचं गाणं लागलं की पळत जाऊन रिमांड होमला बस गाठायची हा ठरलेला दिनक्रम. जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला. नेहमी ह्या कार्यक्रमाला यायला मला आवडेल.
तसेच श्री अरुण जाधव यांनी त्यांच्या भाषणात गाणी म्हणताना गाण्याच्या शब्दामागील भाव आणि गाणी तयार होतानाचे किस्से समजून घेतले तर गाणी आणखी प्रभावशाली होतात वगैरे असे बोलून सर्व गायकांना मार्गदर्शन केले.
सुहाना सफर ग्रुपचे विजय साबळे शिरीष खुटाळे ,सचिन शेरकर चंद्रशेखर बोकील, डॉक्टर सुहास पाटील ,श्री शिवकुमार, चंद्रशेखर प्रभुणे ,मंजुषा पोतनीस, वनिता कुंभार ,सुषमा बगाडे, कविता शिवकुमार, ममता नरहरी, स्मिता शेरकर ,तरन्नुम सय्यद ,यांनी गाणी सादर करून उपस्थित प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
श्री विजय साबळे यांनी सदर कार्यक्रमात दिवंगत धर्मेंद्र यांच्या आठवणी प्रित्यर्थ त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी सादर केली.
सदर कार्यक्रमाचे निवेदन ऍड स्नेहल कुलकर्णी यांनी केले. ध्वनी संयोजनाची जबाबदारी श्री.सुभाष कुंभार यांनी सांभाळली.

