पुणे ,सातारा घाट परिसरात रेड अलर्ट


 

मुंबई
राज्यात पुढील २४ तासासाठी रायगड, रत्नागिरी, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली या सहा जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट परिसरात रेड अलर्ट देण्यात आला असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रामार्फत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना दि.२५ जुलै २०२५ सायंकाळी ५.३९ ते दि. २७ जुलै २०२५ रात्रौ ८.३० पर्यंत ४.१ ते ४.८ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. समुद्राची धूप आणि उंच लाटांचे तडाखे समुद्र किनारी येण्याचा इशारा देण्यात आला असून जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळी ओलांडली असून नागरीकांना सतर्कतेचा सूचना देण्यात आल्या आहेत. पवना धरण ८२.२१% भरले असून पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे पवना धरणातून १६०० क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडले जाऊ शकते त्या अनुषंगाने नागरिकांना सूचित करण्यात आले आहे.
मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात पाणी पुरवठा करणाऱ्या मोडक सागर, मध्य वैतरणा आणि तानसा या धरणातुन अनुक्रमे ४४८८.२५, २०१२.६७ आणि ३३१५.२५ क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. आपत्तीच्या अनुषंगाने प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना संभाव्य आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!