यशोदा टेक्निकल कॅम्पसमार्फत सायबर सुरक्षेबाबत जनजागृती
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर गुन्हेगारी विषयांना प्राधान्य
सातारा
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोडोलीच्या विद्यार्थ्यांनी ‘सायबर सुरक्षा’ आणि ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (AI) च्या वापरासंबंधी सामूहिक शपथ घेतली. यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा आणि क्विक हिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या प्रकल्पांतर्गत हा शपथविधी घेण्यात आला. गणेश राणे आणि अनिकेत शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षिततेची आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सुरक्षित वापराची शपथ घेतली.
सायबर गुन्हेगार आता कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगचा वापर करून अधिक स्मार्ट हल्ले करत आहेत. यामुळे सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करणे अत्यावश्यक बनले आहे. विद्यार्थी आणि पालकांना सायबर धोके कसे ओळखायचे आणि त्यापासून सुरक्षित राहण्याचे मार्गदर्शन देणे हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.ऑनलाईन गेम्स आणि सोशल मीडियावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. लहान मुलांमध्ये ऑनलाईन गेम खेळण्याचे प्रमाण वाढले असून, युजर्सच्या माहितीचा चुकीचा वापर करून फसवणूक केली जात आहे.कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅटबॉट्स आणि फेक प्रोफाइल्स तयार करून मुलांना जाळ्यात ओढण्याचे प्रकार वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर, शाळांमध्ये सायबर सुरक्षा शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे, जिथे मुलांना आणि त्यांच्या पालकांना सायबर धोके आणि एआय चा सुरक्षित वापर याबाबत मार्गदर्शन केले जाईल.
सायबर गुन्हेगार आता एआय चा वापर करून व्यक्तीगत आणि आर्थिक माहिती गोळा करत आहेत. एआय -आधारित साधनांचा वापर करून फिशिंग ईमेल्स, फेक वेबसाईट्स, आणि फेक सोशल मीडिया अकाउंट्स तयार केली जातात. यामुळे सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, अशी माहिती अजित पारसे यांनी दिली.
काहीवेळा एआय आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचे आश्वासन देऊन फसवणूक केली जाते. तसेच, फिनटेकच्या नावाखाली बँकिंग धोके वाढले आहेत. या गुन्हेगारांकडून AI चा वापर करून बनावट वेबसाइट्स आणि डमी युजर्स तयार केले जातात, ज्यामुळे फसवणूक अधिक सोपी होते. या उपक्रमाची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोडोलीच्या शिक्षकांनी आणि ग्रामस्थांनी यशोदा टेक्निकल कॅम्पस आणि क्विक हिल फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
