शिष्यांच्या कामगिरीमुळेच संगीतगुरु ओळखले जातात
दीपलक्ष्मी सभागृहातील कार्यक्रमात मुकुंद फडके यांचे प्रतिपादन
सातारा
संगीत क्षेत्रासाठी गुरु शिष्य परंपरा अत्यंत महत्त्वाची असते. शिष्याने केलेल्या चांगल्या सांगीतिक कामगिरीमुळेच गुरूला ओळख प्राप्त होते असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार संपादक मुकुंद फडके यांनी व्यक्त केले. दिपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहांमध्ये दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि सूरसंगम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या गाण्यांच्या मैफिल कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते .यावेळी व्यासपीठावर प्रकाश गवळी, डॉक्टर सारिका देशपांडे ,साबुद्दीन शेख, युनुस शेख ,आदी मान्यवर उपस्थित होते .
गुरु पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बोलताना मुकुंद फडके यांनी चित्रपट क्षेत्रातील गुरु शिष्य परंपरेचा आढावा घेतला. चित्रपट निर्मिती असो, दिग्दर्शन असो,लेखन असो किंवा गायन आणि संगीत दिग्दर्शक असो या प्रत्येक क्षेत्रामध्ये गुरूच्या मार्गदर्शनामुळे शिष्यांनी चांगली कामगिरी केली असे त्यांनी सांगितले. अनेकांनी एकलव्यप्रमाणे फक्त गुरुचे काम पाहून प्राविण्य मिळवले.याबाबत काही उदाहरणे त्यांनी दिली. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्रकाश गवळी यांनी शिरिष चिटणीस यांच्या पुढाकाराने होत असलेल्या या साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे कौतुक केले .चिटणीस यांच्या या पुढाकाराने सातारा शहराची वेगळी ओळख निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
शिरीष चिटणीस म्हणाले भारतीय संगीत क्षेत्रातील गुरु-शिष्य परंपरा जगभरातील संगीतकाराना आकर्षित करते. भारतीय भाषेतील मराठी भाषेतील नाट्य संगीत आणि संगीत नाटक ही जगाला दिलेली मराठी भाषिकांची अविस्मरणीय देणगी आहे. जगात सर्वत्रच होणारे कराओके संगीत-गाण्यांचे कार्यक्रम समाजाला जातीभेद,वर्णभेद विसरून एकत्र येऊन आनंद घेण्यासाठी महत्वाचे माध्यम ठरत आहे.मुकुंद फडके यांचा चित्रपट गीतांविषयी आणि एकूणच चित्रपटांविषयी दांडगा व्यासंग आहे.त्याचा लाभ साताऱ्यातील कराओकेवर गाणी गाणाऱ्या कलाकारांना होत आहे. चित्रपट आणि चित्रपटातील गाण्यांमुळे वाचन संस्कृती विकसित होते असा माझा अनुभव आहे. यासाठी आम्ही जादा प्रयत्न करीत आहोत असेही भाष्य चिटणीस यांनी केले.या कार्यक्रमामध्ये इतर सुरेल गाण्यांबरोबरच ‘ओ मनचली कहा चली’ आणि “सांग कधी कळणार तुला” ही दोन गाणी सादर झाली.
या दोन्ही गाण्यांच्या अनुषंगाने डॉक्टर सारिका देशपांडे यांनी काही विश्लेषण केले.ऑन बीट आणि ऑफ बीट गाणी कशी तयार होतात, त्यामध्ये कसा गोडवा निर्माण होतो आणि ऐकताना ती कशी ऐकायला हवीत तसेच अ-मराठी गायक यांचे मराठी गाण्यांमधले उच्चार याबद्दल डॉक्टर देशपांडे बोलल्या.
कार्यक्रम सुंदर झाला आणि कार्यक्रमाला श्रोत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया मिळाल्या.
कोणत्याही गाण्यातील शब्द किती महत्त्वाचे असतात याबाबत मार्मिक विवेचन त्यांनी केले.शिष्याच्या कामगिरीतील गुरुचे महत्त्व विशद करून गुरूच्या मार्गदर्शनाशिवाय चांगली कामगिरी करणे अशक्य असल्याचेही त्यांनी सांगितले .यावेळी कराओके कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक गायक कलाकार तयार करणाऱ्या शाबुद्दीन शेख आणी युनूस शेख यांचा सत्कार त्यांच्या शिष्यांतर्फे करण्यात आला. उपस्थित सर्व गायक कलाकारांनी बहारदार गाणी सादर करून वाहवा मिळवली.

