संसदेत राहुल गांधींची हिंदूंवर टीका
पंतप्रधान मोदींनी दोन वेळा उठून सुनावलं
नवी दिल्ली
लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून सोमवारी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदूबाबत केलेल्या वक्तव्याने सभागृहात गदारोळ माजला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावावर चर्चेवेळी राहुल गांधी यांनी म्हटलं की, स्वत:ला हिंदू म्हणणाऱे हिंसाचार घडवत आहेत.
लोकसभेत राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर गोंधळ सुरू झाला. भाजपच्या खासदारांनी गोंधळ घातला. राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर पंतप्रधान मोदींनी अचानक जागेवरून उठून चोख प्रत्युत्तर दिलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींच्या विधानावर म्हटलं की, “संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणं गंभीर विषय आहे. राहुल गांधींनी हिंदुंचा अपमान केलाय.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यानंतर खाली बसले. लोकसभेत यानंतर राहुल गांधी यांनीही पुन्हा टीका केली. राहुल गांधी म्हणाले की, भाजप आणि मोदी म्हणजे पूर्ण हिंदू समाज नाही. राहुल गांधींच्या या विधानानंतर पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी जागेवरून उठले आणि राहुल गांधींवर टीका करत म्हणाले की, विरोधी पक्षनेत्यांनी गांभीर्याने घ्यायला हवं. मला संविधानाने हेच शिकवलं आहे.
लोकसभेत राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही लगेच प्रत्युत्तर दिलं. अमित शहा म्हणाले की, राहुल गांधींनी हिंदुंचा अपमान केलाय. राहुल गांधींनी माफी मागावी. सर्व हिंदूंना हिंसक म्हणल्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागायला हवी. कोट्यवधी लोक हिंदू असल्याचा अभिमान बाळगतात. राहुल गांधींना ते सगळे हिंसक वाटतात का? असा प्रश्नही अमित शहांनी विचारला.
अमित शहांनंतर राहुल गांधींनी पुन्हा बोलताना भगवान शंकराचा फोटो दाखवला आणि म्हटलं की, भगवान शंकराचा फोटो पाहिलात तर तुम्हाला समजेल की हिंदू कधी दहशत आणि द्वेष पसरवू शकत नाहीत. पण भाजप दिवस रात्र दहशत आणि द्वेष पसरवत आहे. राहुल गांधींनी पुन्हा एकदा माइक बंद केल्याचा आरोप केला. लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधींनी सभापतींच्या हेतूवर शंका उपस्थित केल्याबद्दल फटकारले. तसंच तुमचा माईक कधी बंद केला नाही असं स्पष्ट केलं.
