अंतरवालीत ओबीसीचे उपोषण सुरु
जालना
मराठा समाजातील सगेसोयरेंच्या आरक्षणाची मागणी करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारच्या विनंतीनंतर आपले उपोषण मागे घेतलं.परंतु, आता ओबीसी समाज देखील आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे.अंतरवालीत सराटीच्या गावच्या वेशीवरच ओबीसी नेत्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे कालपासून आमरण उपोषणाला बसले आहेत.
याबाबत माहिती देताना उपोषणकर्ते म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणावरून किंवा मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला अनुसरून, सगेसोयरेंच्या अध्यादेशासंदर्भात आम्ही संवेदनशील पद्धतीने विचार करत आहोत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्टेटमेंट दिलेलं आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रातील ओबीसी, विजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गाच्या मनामध्ये आरक्षणावरून भीती निर्माण झाली आहे.जर तसा काही अध्यादेश त्यांनी काढला तर ओबीसीच्या मूळ आरक्षणावर अतिक्रमण येणार आहे.डॉमिनेटिंग असणारी मराठा कास्ट जर ओबीसीमध्ये सामील झाली तर आमचे हक्क, अधिकार , पंचायतराज मधील आरक्षण अजिबात उरणार नाही आणि हे सामाजिक न्यायला धरून उरणार नाही.
ते पुढे म्हणाले, त्यामुळे राज्यातील ओबीसी, विजेएनटी, एसबीसी समाज कुठेतरी नाराज असून असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.राज्य सरकारने मनोज जरांगे यांची जशी बाजू ऐकून घेतली तशी आमची आमची देखील बाजू ऐकून घ्यावी.आमच्या आरक्षणावर गदा येऊ नये यासाठी आम्ही आमरण उपोषण करत आहोत.
