मुलींच्या जन्मदराबाबत अजित पवारांचं वादग्रस्त विधान
येणाऱ्या काळात द्रौपदीचा विचार करावा लागेल की काय?
इंदापूर :
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे डॉक्टर आणि वकिलांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी गर्भपात आणि मुलींच्या जन्मदराबाबत विधान करताना भविष्यात सगळंच अवघड होणार आहे. येणाऱ्या काळात द्रौपदीचा विचार करावा लागेल, असा प्रसंग येऊ शकतो असे वादग्रस्त विधान त्यांनी केल्याने चर्चा सुरु झाली आहे
लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत पहित्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी होणार आहे. यासाठी आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. मात्र प्रचाराचा आज शेवटचा शेवटचा दिवस असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार बारातमी, दौंड आणि इंदापूर दौऱ्यावर होते.
डॉक्टरांनी सरकारी यंत्रणेमधील काही जाचक अटी कमी करण्याची मागणी अजित पवार यांच्याकडे केली होती. यासंदर्भात सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, सरकारी यंत्रणेकडून निश्चित तुम्हाला त्रास होत असेल, काही ठिकाणी सोनोग्राफी सेंटरला त्रास दिला जात असेल. परंतु बीडच्या घटना आणि पाठीमागील काळात 1000 मुले जन्माला आले की त्यावेळेस 800 ते 850 मुली जन्माला येत होत्या. पण हा दर 790 पर्यंत गेला. हे सर्व पाहता यापुढे द्रौपदीचा विचार करावा लागेल की काय असा प्रश्न पडतो. परंतु हा गंमतीचा भाग झाला. मला कुणाचा अपमान करायचा नाही, परंतु डॉक्टरांनी केलेल्या मागण्यांचा शासन दरबारी विचार केला जाईल, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले की, माणूस खरं कोणाशी बोलत असेल तर तो डॉक्टरशी बोलतो. त्यामुळे तुमच्याकडे जर तुमच्याकडे कोणी आलं तर त्यांच्याशी बोला, त्यांना विचारा काय चाललं आहे. जर त्यांनी आमचं नाव घेतलं तर त्यांच्याशी जरा चांगलं बोला आणि जर दुसऱ्याचं नाव घेतलं तर त्यांना जोरात इंजेक्शन द्या, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवार यांनी केली. याचवेळी अजित पवार यांनी म्हटले की, आतापर्यंत तुम्ही आमच्या खासदाराला निवडून दिले आहे. त्यामुळे आता महायुतीच्या खासदाराला निवडून द्या. महायुतीचा खासदार आतापर्यंत निवडून दिलेल्या खासदारांपेक्षा उजवा असेल, असा विश्वास व्यक्त केला.
