लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची आत्महत्या
विहिरीत उडी मारून आयुष्य संपवले
पुणे :
लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने विहिरीत उडी मारून जीवनयात्रा संपवन्याची घटना पुण्यातील तळेगावमध्ये घडली. दोन्ही कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
सूरज रायकर हा 28 वर्षीय तरुण मंगळवारी बोहल्यावर चढणार होता. देहूगावात सायंकाळी साडे पाच वाजता सूरज विवाहबंधनात अडकून, नव्या आयुष्याची सुरुवात करणार होता. लग्नाची सगळी तयारी झाली होती. तळेगावातील राहत्या घरासमोर मांडव ही टाकण्यात आला होता. याच मांडवातून आज सकाळी सुरजचं वऱ्हाड वाजत-गाजत जाणार होतं. सोमवारच्या रात्री या आनंदात सगळे झोपी गेले, पण सुरजच्या मनात काय सुरु आहे याची पुसटशी कल्पना कुटुंबातील कोणालाच नव्हती. सूरजने कोणाला काहीही न सांगता, पहाटे साडे चार वाजताचं घर सोडलं. काहीवेळाने कुटुंबातील सर्वांची लग्नस्थळी पोहचण्यासाठी लगबग सुरु झाली. पण सूरज कुथे आहे हा प्रश्न निर्माण झाला आणि सर्वांची धांदल उडाली.
तितक्यात मामाचे लक्ष मोबाईलवर गेले, भाचा सुरजने एक मेसेज त्यांना पाठवला होता. “मला हे लग्न करायचं नाही, मी आत्महत्या करत आहे.’ असं त्यात नमूद असल्याचं पाहताच कुटुंबाला मोठा धक्का बसला. मग सर्वानी परिसरात सूरजला शोधण्याचा प्रयत्न केला, तेंव्हा घरापासून काही अंतरावर असणाऱ्या विहिरीजवळ गाडी अन काही वस्तू आढळल्या. यावरून सुरजने विहिरीत उडी मारली असेल, असा अंदाज बांधण्यात आला. विहिरीतील पाणी शेवाळलेलं होतं, त्यामुळं नेमका अंदाज बांधायला कोणीच तयार नव्हतं. वेळ पुढं सरकत होती, नवरी मुलीच्या घरचे देहूगावातील लग्नस्थळी वऱ्हाड घेऊन निघण्याच्या तयारीत होतेचं. तितक्यात सुरजच्या कुटुंबीयांनी घडला प्रसंग त्यांच्या कानावर टाकला आणि आम्ही पुढची घडामोड कळवेपर्यंत वऱ्हाड काढू नये, असं मुलीच्या कुटुंबियांना कळविण्यात आलं.
तळेगाव पोलिसांना ही याबाबतीत कळविण्यात आलं, त्यांनी मावळ वन्यजीव रक्षक पथकाला पाचारण केलं. त्यांनी विहिरीतील अशुद्ध पाणी बाहेर काढायला सुरुवात केली, तेंव्हा दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सुरजचा मृतदेह आढळला. नवरी मुलीच्या कुटुंबियांना ही बाब कळविण्यात आली. या घटनेनं दोन्ही कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
