घारापुरी लेणीतील शिवमंदिरात नियमित पूजा करण्याचा अधिकार द्या
महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांची दादर येथील आंदोलनात मागणी
मुंबई
मुंबईजवळील घारापुरी लेण्या (एलिफंटा केव्हज्) येथे ब्रह्मा, विष्णु, महेश यांच्या भव्य मूर्ती आहेत. तसेच प्राचीन शिवपिंडही आहे. हिंदूंचा सांस्कृतिक ठेवा आणि धार्मिक स्थळ असलेल्या, तसेच केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असलेल्या घारापुरी लेणीतील शिवमंदिरात हिंदूंना महाशिवरात्रीपासून नियमित पूजा करण्याचा अधिकार द्या, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी दादर येथील आंदोलनात केली.
6 मार्च या दिवशी दादर (प.) येथे झालेल्या आंदोलनात विविध मंदिरांचे विश्वस्त, महाराष्ट्र मंदिर महासंघ, वज्र दल, श्री शिवकार्य प्रतिष्ठान, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, भाविक आणि हिंदू धर्मप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी आंदोलनकर्त्यांनी हातात प्रबोधनपर फलक धरले होते आणि घोषणाही देण्यात आल्या. भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्री यांना देण्यात येणाऱ्या निवेदनावर लोकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या, ज्याला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
घारापुरी येथील लेणी भारतीय शिल्पकलेचा सर्वोत्कृष्ट नमुना मानला जातो. ही लेणी केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असून येथील शिवपिंडीची पूजाअर्चा बंद आहे. नुकतेच 15 फेब्रुवारी येथे घारापुरी लेणी येथे जाऊन तेथील शिवपिंडीची प्रतिकात्मक पूजाअर्चा करत हिंदूंना तिथे पूजेचा अधिकार मिळावा, यासाठी हिंदू संघटनांनी जनआंदोलन करत केंद्र सरकारकडे मागणीही केली होती आणि आता पुन्हा एकदा दादर येथे घारापुरी येथील शिवपिंडीची नियमित पूजा सुरू करण्याच्या मागणीसह या आंदोलनात केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अंतर्गत देशभरातील सर्वच हिंदु धार्मिक प्रार्थनास्थळांमध्ये पूजेची अनुमती द्यावी, ही मागणी सुद्धा या वेळी करण्यात आली.
पुरातत्त्व खात्याच्या अंतर्गतच अनेक ठिकाणी धार्मिक स्थळांच्या परिसरात झालेली अतिक्रमणे हटवून तेथील प्रवेशासाठी आकारण्यात येणारे शुल्क रहित करून तेथे ‘प्रवेश विनामूल्य’ करणे, तसेच तिथे पावित्र्य जपण्यासाठी पादत्राणांसह प्रवेश वर्ज्य करणे आणि तोकड्या कपड्यांवर निर्बंध आणणे आदी पवित्र रक्षण करणारी आचारसंहिता पुरातत्व विभाग आणि केंद्र सरकारने तात्काळ लागू करावी, या मागण्याही या वेळी करण्यात आल्या. या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने जनआंदोलने ठिकठिकाणी सुरुच राहतील, असे मंदिर महासंघाने काढलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
