कलम रत्न पुरस्कार यशेंद्र क्षीरसागर यांना प्रदान
सातारा,
विविध क्षेत्रातील उत्कृष्ट आणि अद्वितीय कार्याबद्दल दिला जाणारा राज्यस्तरीय कलम रत्न पुरस्कार सातारा जिल्हा परिषदेचे वडूज पंचायत समिती येथे कार्यरत सांख्यिकी विस्तार अधिकारी, प्रसिद्ध वक्ते, लेखक, कवी यशेंद्र क्षीरसागर यांना प्रदान करण्यात आला. मुंबई येथे हा रंगतदार सोहळा “मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय येथील सुरेंद्र गावस्कर सभागृहात” मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी प्रसिद्ध कवी, विचारवंत अरुण म्हात्रे, प्रसिद्ध काव्य कार्यक्रम वाचक विसुभाऊ बापट आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, समाजसेवक महेश्वर तेटांबे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संस्थेतर्फे सन्मान करताना श्री. तेटांबे म्हणाले,” प्रशासन, काव्य, समाजसेवा ,गायन अशा विविध क्षेत्रात यशेंद्र क्षीरसागर यांचे कार्य समाजाला आणि प्रशासनात काही करू इच्छिणाऱ्या तरुणांना स्फूर्तीदायक आहे .त्यांनी प्रशासनामध्ये विविध उपक्रम स्वखर्चाने आणि आत्मस्फूर्तीने राबवले आहेत. तीन पुस्तकांचे लेखक असलेले श्री. क्षीरसागर यांनी सलग 25 तास गरीब विद्यार्थ्यांना मोफत अध्यापनाचा विश्वविक्रम आणि सर्वात मोठ्या दीर्घ कवितेचा विक्रम केला आहे. ते उत्कृष्ट सूत्रसंचालक आणि वक्ते आहेत. मोफत व्याख्याने देऊन विद्यार्थी ,ज्येष्ठ नागरिक अशा विविध घटकांना त्यांनी सातत्याने मार्गदर्शन केले आहे. सातत्याने समाजसेवा करणाऱ्या आणि गेली तीन दशके लेखन करून विचार सेवा देणाऱ्या श्री.क्षीरसागर यांचा सन्मान करताना आम्हाला आनंद वाटत आहे.”श्री अरुण म्हात्रे आणि विसुभाऊ बापट यांनी श्री. क्षीरसागर यांचे कार्य अनुकरणीय आणि सध्या काळात अत्यंत दिशादर्शक असल्याचा गौरव केला. श्री.क्षीरसागर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले,” पुरस्कार हा कार्य करणाऱ्या व्यक्तीला प्रेरणा देतो. या प्रेरणेतूनच पुढे मोठे कार्य उभे राहते. आर्यारवी एंटरटेनमेंट या संस्थेचे कार्य मोठे आहे. त्यांनी दिलेल्या सन्मानाचा स्वीकार करताना जबाबदारीची जाणीव ठेवून पुढील कार्य चालूच राहील.”
फोटो ओळ
यशेंद्र क्षीरसागर यांना राज्यस्तरीय कलम रत्न पुरस्कार प्रदान करताना अरुण म्हात्रे, विसुभाऊ बापट, महेश्वर तेटांबे.

