राज्यातील पीएनजी गॅसच्या जोडण्या वाढवण्याची गरज:भुजबळ
तीन महिन्यांनी कदाचित एलपीजी गॅसचा पुरवठा बंद होऊ शकतो
नवी दिल्ली
आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशभरात गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. अशातच आता राज्याचे अन्न न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तीन महिन्यांनी कदाचित एलपीजी गॅसचा पुरवठा बंद होऊ शकतो, असे संकेत दिले. ते शनिवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी भुजबळ यांनी एलपीजी गॅसचा पुरवठा बंद करण्याबाबतच्या केंद्र सरकारच्या पत्रकाचा उल्लेख करत राज्यातील पीएनजी गॅसच्या जोडण्या वाढवण्याची गरज व्यक्त केली.
देशातील निवासी आणि व्यावसायिक आस्थापनांना एलपीजी गॅसचा पुरवठा सुलभपणे कसा करता येईल? यामध्ये कोणत्या अडचणी आहेत, याचा आढावा घेण्यासाठी आज दिल्लीत सर्व राज्यांच्या सचिवांना आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांना बोलवण्यात आले होते. या बैठकीला केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर , पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी , प्रल्हाद जोशी हे केंद्रीय मंत्री होते. प्रत्येक राज्याचे मंत्री आणि सेक्रेटरींनी या बैठकीत काही सूचना केल्या. आपण केंद्र सरकारला सांगितले की, पीएनजी गॅस (Pipe Gas) सध्या स्वस्त पडत आहे. त्याचा जास्तीत जास्त उपयोग झाला पाहिजे. त्याचा जास्त प्रसार झाला पाहिजे. केंद्र सरकारच्या एका पत्रकात तीन महिन्यांनी कदाचित एलपीजी बंद होईल, असा उल्लेख होता. त्यामुळे आपण पीएनजीच्या जास्तीत जास्त जोडण्या करुन घेतल्या पाहिजेत. जिथे जिथे यासंदर्भात काम करणे शक्य आहे तिथे सुरु केले पाहिजे. सगळ्या नगरपालिकांनी पीएनजीच्या जोडण्या वाढवल्या पाहिजे. पाण्याचं आणि वीजेचं कनेक्शन असल्यावरच इमारतींना ओसी दिला जातो, त्याप्रमाणेच आता पीएनजी कनेक्शनच्या सक्तीची अट टाकली पाहिजे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.
जोडण्या लवकर करायच्या आहेत. पाइपलाइन टाकण्यासाठी विविध विभागांत परवानग्या मागितल्या जातात. परवानगी मिळाली, असे समजावे. या परवानग्या 24 तासांत दिल्या जातील. पीएनजी काम करणाऱ्यांना 24 तास परवानगी राहील, असेही छगन भुजबळ यांनी म्हटले.

