मराठी भाषा संतांनी टिकवली: डॉ तारा भवाळकर


भाषणाला नरेंद्र मोदी आणि शरद पवारांची दाद
नवी दिल्ली
मराठी फक्त लिखीतच नाही तर ती बोलीतून पसरली आहे. भाषा हे संस्कृतीचं बलस्थान असते. भाषा ही जोडणारी गोष्ट असायला हवी, तोडणारी नाही असे मत दिल्लीतील 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केलं. एक स्त्री अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्ष झाली हे महत्वाचं नाही तर गुणवत्ता हा विषय महत्वाचा आहे असंही तारा भवाळकर म्हणाल्या. मराठी भाषा संतांनी टिकवली, आमचे संत पुरोगामी होते, फुरोगामी लोकं काहीही म्हणू देत असेही भवाळकर म्हणाल्या. तारा भवाळकरांच्या भाषणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवारांनी दाद दिली.
आज दिल्लीत 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे (SP) अध्यक्ष शरद पवार यांच्यासह संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते झाले
भाषा ही बोलली तर जीवंत राहते, नुसती पुस्तकात आणि ग्रंथात असून उपयोग नाही महाराष्ट्राला पाडुंरंगाचे स्मरण करायला लावणारी ही मराठी भाषा आमच्या संतांनी जीवंत ठेवल्याचे त्या म्हणाल्या. मराठी भषा बोलण्यातून विस्तारली आहे, त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांना खेड्यापाड्यातील मावळे मिळाले असेही तारा भवाळकर म्हणाल्या.
विठ्ठल रखुमाई हे आमच्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. हे आमच्या उदार संस्कृतीचं दर्शन असल्याचे भवाळकर म्हणाल्या. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी असे सांगणारे संत सावता माळी यांनी मराठी भाषा टिकवली, माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजासी जिंक, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन असे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले, या संतांनी मराठी भाषा जीवंत केल्याचे भवाळकर म्हणाले.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!