८ जागा तरी जिंकून दाखवा
भुजबळांचं जरांगे पाटलांना आव्हान
सांगली
राज्यातील सत्ताधारी पक्षातील आमदार पाडा, असे जाहीर आवाहन मनोज जरांगे पाटील करत असतानाच आता छगन भुजबळ यांनी पलटवार केला आहे राज्यात छगन भुजबळ यांना जे जे नेते प्रचाराला घेऊन जातील. त्या मतदारसंघातील आमदार येत्या विधानसभेत पाडा, असे जाहिर वक्तव्य मनोज जरांगे पाटलांनी केलं. त्यावर सांगलीत छगन भुजबळ यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय. आम्ही २८८ जागा लढू म्हणणाऱ्यांनी किमान ८८ तरी जागा लढाव्या, त्यातील ८ तरी निवडून आणाव्यात,असं आव्हानच भुजबळांनी जरांगे पाटलांना दिलंय. काल सांगलीत ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
भुजबळ म्हणाले की, हिमंत असेल तर मैदानात उतरावं निवडणूक लढावी. असं म्हणत आम्ही कुणाला शिव्या देणार नाही. आम्ही सभ्यतेने बोलू आणि तुम्हालाही सुबुद्धी देण्याची प्रार्थना करू राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी शरद पवारांची भेट घेतल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच अनेकांनी यावर वेगवेगळी चर्चा केली, त्याची आपल्याला फिकीर नाही. आपला हा महाराष्ट्र संपूर्ण देशाला दिशा देतो. हा महाराष्ट्र एकसंघ राहिला पाहिजे,यासाठी प्रयत्न आहे.
दरम्यान, महाराष्ट्राला प्रबोधन चळवळीचा वारसा आहे. सर्व समाजाला सोबत घेऊन छत्रपती महाराज यांनी स्वराज्य निर्माण केलं. त्यांच्या स्वराज्यात सर्वांना समान स्थान होतं. त्यांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सैनिक होते. त्यात अंगरक्षकही होते. त्यांनी हिंदू-मुस्लिम यांसह सर्व लहान-सहान जातींना सोबत घेऊन राज्य केलं. आता मात्र काही लोक छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतात आणि आपल्याच लोकांना मारतात. त्यांनी अनेकांची घरे जाळली, अनेकांना मारहाण केली. हे कशासाठी करताय? तुम्हाला आरक्षण हवंय ते कायद्याने घ्या. आमचा कोणताही विरोध नाही. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या हीच मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले
