शरद पवारांचा आमदार फुटला
पराभवानंतर जयंत पाटील यांचा दावा
मुंबई
विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागला. त्यात महायुतीचे 9 उमेदवार जिंकले. तर महाविकास आघाडीच्या तीन उमेदवारांपैकी शरद पवार गट पुरस्कृत शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला.यावर प्रतिक्रिया देताना, जयंत पाटील यांनी शरद पवार यांचाच एक आमदार फुटला असल्याचं म्हटलं आहे. तर काँग्रेसने सेकंड प्रेफरन्सची मतं दिली असती तर माझा विजय झाला असता, असं म्हणत त्यांनी पराभवाचं खापर काँग्रेसवर फोडलं आहे.
जयंत पाटील यांना विधानपरिषद निवडणुकीत 12 मतं मिळाली. ही 12 मतं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या 12 आमदारांची असल्याचा अंदाज बांधला जात होता. त्यामुळे शरद पवार गटानं आपली पूर्ण ताकद त्यांच्या पाठिशी उभी केल्याचंही सांगितलं गेलं. पण आता खुद्द जयंत पाटील यांनीच शरद पवार गटाची सर्व बारा मतं आपल्याला मिळाली नसल्याचं पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये नेमकं चाललंय काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
मी पराभवाचं आत्मचिंतन करत आहे. महाराष्ट्रात या पद्धतीचं राजकारण आधी नव्हतं. थोडंफार इकडे-तिकडे व्हायचं. मी निवडणुका लढवल्या तेव्हा अशी स्थिती नव्हती. हे असं घडत असेल तर जनतेनं दोन्ही सभागृहं कोण ताब्यात घेईन, याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असं जयंत पाटील म्हणाले.
मी राष्ट्रवादीच्या 12 मतांवर उभा होतो. त्यातलं एक मतं फुटलं. आमचीही मतं फुटली. मला जर चार मंत मिळाली असती, तर दुसऱ्या पसंतीच्या मोजणीला मी 24 ते 30 मतं आणखी घेऊन निवडून आलो असतो. तेच गणित होतं, असं म्हणत शरद पवार गटाची पूर्ण 12 मतं आपल्याला मिळाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आम्हाला मानणारी आमच्या आघाडीतील मतं फुटली तर त्यांच्या एका मताचं काय घेऊन बसलात? अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.
मला अभ्यास, आत्मचिंतनाची गरज आहे. मी आज जास्त बोलणार नाही. दोन-चार दिवसांत बोलेन. राष्ट्रवादीचं एक मत फुटलं. 11 मतं बरोबर मिळाली. मी महाविकास आघाडी, शरद पवारांसबोत आहे. त्यात कुठेही बदल होणार नाही, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. काँग्रेसची सात मतं फुटली या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी म्हटलं की मी त्यावर अजून अभ्यास केलेला नाही.
