नेपाळमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना
2 बस त्रिशूली नदीत वाहून गेल्या;50 प्रवासी बेपत्ता
काठमांडू
नेपाळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनानंतर मोठी दुर्घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेल्या दोन बस नदीच्या पुरात वाहून गेल्याने या अपघातात 50 हून अधिक प्रवासी बेपत्ता झाले आहेत ज्यात काही भारतीयांचाही समावेश आहे.
गुरुवारी पहाटे 3.30 वाजता हा अपघात झाल्याचं सांगितलं जातंय. या अपघातात 7 भारतीय नागरिक आणि बस चालकाचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होतेय, तर 2-3 जणांनी बसमधून उडी मारून आपला जीव वाचवला. मध्य नेपाळमधील मदन-आश्रित महामार्गावर हा अपघात झाला. अपघातग्रस्त दोन बसेसपैकी एक बस काठमांडूहून रौतहाटमधील गौरकडे जात होती तर दुसरी बस ही बीरगंजहून काठमांडूला जात होती.
दोन्ही बसमध्ये चालकासह 50 प्रवासी होते. चितवन जिल्ह्यातील सिमलताल परिसरात नारायणघाट-मुगलिंग मार्गावरील त्रिशूली नदीत दरड कोसळल्याने दोन्ही बस वाहून गेल्या. चितवनचे मुख्य जिल्हा अधिकारी इंदर देव यादव यांनी अपघाताला दुजोरा दिला आहे. उत्तर प्रदेशच्या मदत आयुक्त कार्यालयाने श्रावस्ती जिल्ह्यातील एडीएम एफआर अमरेंद्र वर्मा यांना समन्वयासाठी सूचना दिल्या असून मदत आयुक्त जीएस नवीन यांनी महाराजगंजच्या आपत्ती तज्ज्ञांनाही घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्यात.
बचाव पथकाने भूस्खलनाचा ढिगारा हटवण्यास सुरुवात केली आहे. नेपाळचे पंतप्रधान पुष्प दहल कमल प्रचंड यांनी त्रिशूली नदीत झालेल्या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला असून बचाव आणि मदत कार्य युद्धपातळीवर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अपघातग्रस्त भागात मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे मदतकार्यावर परिणाम होतोय. इतकंच नाही तर नेपाळमधील या पावसाचा परिणाम आता पीलीभीतसह उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहे. नेपाळमधील पावसाचा फटका उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांनाही बसला आहे.
