सातारच्या बोकडाची देशभरात चर्चा
भारतातील सर्वात वजनी देखणा बोकडाचा मान गुलाम ए मुस्तफाला
सातारा
बकरी ईदच्या निमित्ताने बाजारात मोठ्या प्रमाणात बोकड, बकरी यांची खरेदी विक्री होत असते.यंदाच्या वर्षी 17 जून रोजी बकरी ईद आहे. साताऱ्यातील एका बोकडाची आता देशभरात चर्चा सुरू आहे. कारण यंदाच्या वर्षीचा भारतातील सर्वात वजनी देखणा बोकडाचा मान साताऱ्यातील दस्तगीर बागवान यांनी तयार केलेल्या गुलाम ए मुस्तफा याला मिळाला आहे.
दस्तगीर बागवान यांनी तयार केलेल्या बोकडांची पायापासून कमरेपर्यंत उंची ही चाळीस इंच आणि पायापासून शिंगांपर्यंत उंची ही पाच फूट आहे. त्याची लांबी साडे पाच फूट आणि त्याचे वजन तब्बल एकशे सत्तर किलो आहे.170 किलो वजनाचा राजस्थान येथील कोटा जातीचा हा भारतातील सर्वात मोठा बोकड ठरला असून नुकतीच त्याची खरेदी पुणे येथील एका व्यक्तीने लाखोंच्या रकमेत केली आहे. दस्तगीर बागवान यांना खूप आधीपासून या बोकडांची आवड आहे. साधारण वर्ष – दीड वर्षांचा एखादा चांगल्या जातीचा बोकड खरेदी करायचा वर्षभर त्याचे मुलासारखे संगोपन करायचे. त्याला आवश्यक खुराक द्यायचा हा खुराक म्हणजे रोज दोन लिटर दूध, सुका मेवा, हिरवी तरकारी, सफरचंद, मका, हरभरा, विविध प्रकारच्या डाळींचे मिश्रण. यासाठी दस्तगीर बागवान यांना रोज चार ते पाच तास द्यावे लागतात. शिवाय उन्हाळ्यात त्याच्यासाठी स्वतंत्र कुलिंग व्यवस्था आजारी पडल्यास डॉक्टर ही सर्व व्यवस्था केली जाते.
गेल्या वर्षी त्यांच्या बोकडाचे वजन 130 किलो होते. या वर्षीच्या बोकडाचे वजन हे विक्रमी ठरले आहे. सध्या या बोकडाची देशभरात मोठी चर्चा असून मागील महिन्याभरापासून बोकड पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत होती.
