प्रकाश आंबेडकरांचा खरा चेहरा समोर आला
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची टीका
मुंबई
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा खरा चेहरा राज्यातील जनतेने ओळखला आहे, असं वक्तव्य महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. दैनिक ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत चव्हाण यांनी आंबेडकर यांच्यावर टीका केली
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, लोकांना प्रकाश आंबेडकरांचा खरा चेहरा समजला आहे. त्यामुळे यावेळी त्यांना एक टक्का मतं मिळतील की नाही याबाबत शंका आहे. महाविकास आघाडीत आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला लोकसभेच्या पाच जागा देत होतो. त्यांनी त्या घ्यायला हव्या होत्या. मात्र त्यांनी त्या जागा घेतल्या नाहीत.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, देशातील दलित समाज भाजपापासून दूर गेला आहे. या लोकांच्या (भाजपाच्या) ४०० जागा आल्या तर आपलं संविधान बदललं जाईल हे दलित समुदायाच्या डोक्यात पक्कं झालं आहे. संविधान धोक्यात आहे याची त्यांना जाणीव आहे. त्याचबरोबर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने आमचं नुकसान केलं खरं, मात्र आता तसं होणार नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला ७ टक्के मतं मिळाली होती. मात्र त्यावेळी त्यांची असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएमशी (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाशी) युती होती. त्या युतीत त्यांना ७ टक्के मतं मिळाली होती. त्यापैकी तीन ते साडेतीन टक्के मतं कदाचित वंचितची असतील. मात्र यावेळी वंचितला ती साडेतीन टक्के मतंही मिळणार नाहीत.
चव्हाण म्हणाले, यंदाच्या निवडणुकीत फार मोठा बदल जाणवतो. आताच्या घडीला माझं महाराष्ट्राचं जे आकलन आहे, त्यानुसार महाविकास आघाडीला ३२ ते ३५ जागा मिळतील, ही संख्या वाढू शकते. आम्ही या निवडणुकीत पाच मुद्द्यांवर भर दिला आहे. त्यामध्ये महागाई, बेरोजगारी, शेतकरी, दोन्ही प्रकारचा भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार आणि सरकार पाडले वगैरे नैतिक भ्रष्टाचार, शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संविधान बचाव, या मुद्द्यांचा समावेश आहे. हे सगळे मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच आम्हाला दिले आहेत.
