निवडणुकीत राम मंदिराचा प्रभाव नाही?
बेरोजगारी, महागाई आणि विकास हे तीन मुद्दे महत्त्वाचे
मुंबई :
सीएसडीएस-लोकनीती यांनी केलेला सर्व्हे समोर आला असून नागरिकांनी दिलेली उत्तरे पाहता या निवडणुकीत बेरोजगारी, महागाई आणि विकास हे तीन मुद्दे महत्त्वाचे असतील. तर भाजपा प्रचारादरम्यान ज्या मुद्द्यावर सर्वाधिक भर देते आहे, त्या राम मंदिर आणि हिंदुत्व हे मुद्दे जनतेच्या दृष्टीने फारसे महत्त्वाचे नाहीत. सीएसडीएस-लोकनीती प्री-पोल सर्व्हे हा 19 राज्यांमध्ये करण्यात आला आहे. यात 10,019 नागरिकांचा सहभाग नोंदवण्यात आला.
या निवडणुकीत मतदारांना कोणता मुद्दा सर्वाधिक महत्त्वाचा वाटतो, हे जाणून घेण्यासाठी लोकनीती आणि सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेवलपिंग सोसाइटीज ने एक सर्व्हे केला. या यादीत तीन महत्त्वाचे मुद्दे समोर आले आहेत, ते म्हणजे बेरोजगारी, महागाई आणि विकास. विकासकामांबाबत भाजपाला मते मिळतील. मात्र, बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्याचा त्यांना फटका बसू शकतो, आणि हा पक्षासाठी चिंतेचा मुद्दा ठरू शकतो.
देशातील वाढत्या महागाईला 26 टक्के सहभागींनी केंद्र सरकारला दोष दिला आहे. तर 12 टक्के लोकांनी राज्यांना जबाबदार धरले आहे. 56 टक्के लोकांनी राज्य आणि केंद्र अशा दोघांनाही यासाठी दोषी मानल्याचे या सर्वेक्षणात समोर आले आहे. 71 टक्के लोकांनी वस्तू महागल्याचं म्हटलं आहे. या दरवाढीचा फटका आर्थिकदृष्ट्या वंचित (76 टक्के), मुस्लिम (76 टक्के) आणि अनुसूचित जाती (75 टक्के) यांना बसल्याचा दावा करण्यात आला आहे.
मुद्दा उत्तर (टक्केवारीमध्ये)
महागाई 23%
बेरोजगारी 27%
विकास 13%
भ्रष्टाचार 8%
राम मंदिर 8%
हिंदुत्व 2%
