कबड्डी स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंची उत्तम व्यवस्था करावी


उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांचे निर्देश

     मुंबई, दि. 21 : छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा राज्य शासनामार्फत आयोजित करण्यात येते.  यावर्षी ही स्पर्धा ठाणे येथे 24 ते 28 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. ही राज्यस्तरीय स्पर्धा असून स्पर्धेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या खेळाडूंची उत्तम व्यवस्था करावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी आज दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे याबाबत आढावा बैठकीचे आयोजन मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. बैठकीस क्रीडा विभागाचे उपसंचालक नवनाथ फरतडे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुवर्णा बारटक्के, कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी  उपस्थित होते.

Advertisement

या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांची बक्षीसांची रक्कम वाढविण्यासाठी तातडीने क्रीडा विभागाने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देत मंत्री श्री. देसाई म्हणाले, या स्पर्धेत पुरूषांचे 16 व महिलांचे 16 असे एकूण 32 संघ सहभागी होणार आहे. खेळाडूंची निवास, भोजन तसेच वाहतूकीची उत्तम व्यवस्था करावी. स्पर्धा ठिकाणी स्वच्छता, पार्किंग आदींची व्यवस्थाही असावी. महिला खेळाडूंच्या बाबत सुरक्षा, निवासाच्या व्यवस्थेचे विशेष लक्ष ठेवावे. ही स्पर्धा ठाणे (पश्चिम) भागातील ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या जवळील मैदानावर होणार आहे.  स्पर्धेसाठी निधी वाढवून मिळण्याबाबत विभागाने प्रयत्न करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

बैठकीस कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!